

जामखेड: जामखेड तालुक्यातील नान्नज येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेतील फरार आरोपींना जामखेड पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी नान्नज गावात अभिजीत संपत साळवे (रा. नात्रज, ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, आरोपींनी साईनाथ पान टपरी, नात्रज येथे येऊन हातात घातक हत्यारे घेतली आणि फिर्यादी व त्यांच्या मित्रांना धमकावून मारहाण केली. “आमची दहशत संपवतोस का?” अशी धमकी देत त्यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा क्रमांक ४८१/२०२५ नोंद करण्यात आला असून, आरोपींवर भारतीय दंड विधानातील विविध कलमे, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ (सुधारित २०१५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सार्थक विजय सावळे, ओम चंद्रकांत गोरे व सोमनाथ काशीनाथ शिंगेटे (सर्व रा. नान्नज, ता. जामखेड) हे तिघे फरार झाले होते. या तिघांचा शोध घेण्यासाठी जामखेड पोलिसांनी आणि कर्जत उपविभागातील तीन पथकांनी सतत तपास सुरू ठेवला होता. शेवटी, २ नोव्हेंबर २०२५ रोजी काष्टी (ता. श्रीगोंदा) परिसरात पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडण्यात यश मिळवले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवणकर, आणि DYSP प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोसई किशोर गावडे, पोसई कन्हेरे, पोहेकॉ. संजय लोखंडे, पोना रविंद्र बाप, पोहेकॉ. गणेश काळाणे, पोकॉ. देवीदास पळसे, आकाश शेषाळे आदींनी विशेष सहभाग घेतला. या घटनेनंतर दलित संघटनांनी आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी करत आंदोलनही केले होते. अखेर पोलिसांनी तिन्ही फरार आरोपींना जेरबंद केल्याने गावात दिलासा व्यक्त केला जात आहे.