

Jal Jeevan Mission budget
नगर: ‘हर घर जल, हर घर नल’ या हेतूने सुरू झालेल्या जलजीवन योजनेचे बजेट कोलमडले आहे. कामाचे पैसेच मिळत नसल्याने नुकतीच एका ठेकेदाराने आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. जिल्ह्यातही जलजीवनची वाईट परिस्थिती असून, अगोदरच 890 कोटी खर्च करून नेमके काय साध्य झालं, हा प्रश्न असतानाच, आता शासनाकडे आणखी 100 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
एप्रिलपासून दमडीही नगरला मिळालेली नाही. त्यामुळे कार्यारंभ आदेश असलेल्या एजन्सीसोबतच ज्यांनी सबलेटने कामे तोडून घेतली, अशा छोट्या छोट्या ठेकेदारांचेही धाबे दणाणले आहे. (Latest Ahilyanagar News)
जिल्ह्यात 830 योजनांची कामे घेतलेली आहेत. यापैकी 274 योजना पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 550 पेक्षा अधिक योजनांची कामे रखडल्याचे चित्र आहे. अनेक योजनांची मुदत संपली आहे. त्यांच्याकडून मुदतवाढीचे प्रस्ताव दिले जात आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत योजनांच्या कामांसाठी 890 कोटींचा खर्च झाल्याचेही चित्र आहे. या खर्चाबाबतही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना आणखी 100 कोटींची जिल्हा परिषदेतून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेकडून कामाचा कार्यारंभ आदेश देताना एकाच संबंधित पात्र एजन्सीला दिलेला आहे. मात्र त्यानंतर संबंधित एजन्सीने कामांचे तुकडे करून ते ठेकेदारांना वाटले आहेत. अशाप्रकारे कामांचे सबलेट केलेले असल्याने आज पैसे मिळत नसल्याने संबंधित छोटे छोटे ठेकेदार अडचणीत सापडले आहेत.
बड्या एजन्सीकडे मागणी केली असता त्यांच्याकडून सरकारकडे बोट दाखवले जात आहे. तर दुसरीकडे पदरमोड करून कामे केलेल्या उपठेकेदारांचे पैसे मिळत नसल्याने धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडेही संघटनांनी व्यथा मांडल्याचे दिसले आहे.
वर्षनिहाय प्राप्त निधी
2022-23:187.93
2023-24: 576.56
2024-25: 96.00
2025-26: 27.31
(आकडे कोटीत)