

संगमनेर: महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराची ओळख राज्यामध्ये शांतता, सुरक्षितता, शैक्षणिक आणि प्रगतशील शहर म्हणून आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून काही विघातक प्रवृत्तींनी डोके वर काढले असून संगमनेरातील शांतता बिघडवण्याचे काम हे लोक करत आहेत. माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे नागपंचमीचे शुभेच्छा फलक फाडून विकृत प्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढल्याने काँग्रेससह समर्थकांनी संताप व्यक्त केला.
संगमनेर हे शैक्षणिक, सहकार, व्यापार, समृद्ध बाजारपेठ, सुरक्षित शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पायाभूत विकासाच्या सुविधा राबवताना संगमनेरला वैभवशाली बनवले. याचबरोबर हायटेक बसस्थानक, विविध वैभवशाली इमारती, निर्माण केल्या. शिक्षणाचे केंद्र म्हणून संगमनेर उभे राहिले. मेडिकल हब तयार झाले. (Latest Ahilyanagar News)
जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख निर्माण झाली. व्यापार्यांची व नागरिकांची विश्वासार्हता हे संगमनेरचे वैशिष्ट्य राहिले. मात्र मागील आठ महिन्यांपासून काही विकृत प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. हायटेक बसस्थानकाच्या परिसरामध्ये फ्लेक्स बाजीने कहर केला असून यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे.
याबाबत सामान्य नागरिकांनी सातत्याने आवाज उठवला आहे. आठ महिन्यांपासून काही राजकीय पक्षांचे फ्लेक्स संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज या हॅपी हायवेवर लोमकळत पडले आहे. त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दोन दिवसांपूर्वी वडगाव पान परिसरामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छांचा फलकाची काही विकृत प्रवृत्तींनी छेडछाड केली होती. यानंतर संगमनेर तालुक्यामध्ये वातावरण तापले. अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.
दरम्यान, काल पुन्हा स्वामी समर्थ मंदिराजवळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या शुभेच्छांचा असलेला फलक काही विकृत लोकांनी खराब केला आहे. संगमनेर कोणत्या दिशेकडे चालले आहे, याची चिंता आता संगमनेरातील नागरिकांना लागून राहिलेली आहे. असे खराब वातावरण कधीही नव्हते.
मात्र विकृत प्रवृत्तींना पाठीशी घातले जात असल्यामुळे त्या बळावत चालल्या आहे. या वाईट घटनेचा संगमनेरातील तमाम नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून हे कोण करत आहे ते सर्वांना माहिती आहे. याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा संगमनेर मध्ये होणार्या भव्य आंदोलनास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिला आहे.
सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे. नागपंचमीनिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुभेच्छांचा फलक लावला होता. मात्र काही विकृत प्रवृत्तीने हा फलक खराब केल्याने रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक,मेन रोड, बाजारपेठ, नवीन नगर रोड आणि संगमनेर शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. संगमनेरात अशांतता निर्माण करणार्या अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढावे अशी मागणी संगमनेर मधील तमाम स्वाभिमानी नागरिकांनी व महिलांनी केली आहे.