

नगर: पोलिस व जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारूळे यांनी ’एक दिवस, एक गाव भेट’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. पोलिस अधिकारी स्वतः कर्मचाऱ्यांसह गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. सामान्य माणसाला तत्काळ न्याय देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना नागरिकांशी संवाद वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. जेणे करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळेल, अशी आशा आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश वारूळे यांनी दररोज एक गावास भेट देवून नागरिकांशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
अनेक वेळा ग्रामीण भागातील नागरिक कायदेशीर अडचणी, तक्रारी घेऊन पोलिस ठाण्यात येण्यास घाबरतात. हीच भीती दूर व्हावी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी नागरिकांचे सहकार्य मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक गावात जावून पोलिस पाटील, सरपंच, उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष, बचत गटांच्या महिला यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
पोलिस हे सर्वसामान्यांचे मित्र आहेत, हे कृतीतून दाखवणे. अवैध धंदे, चोरी आणि इतर सामाजिक समस्यांसह सोशल मिडीयाबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक आणि त्यांचे पथक दररोज एका गावाची निवड करणार आहे. या उपक्रमाने मुले, महिला व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दल भीती कमी होऊन पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे.
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुईछत्तीसी, वाळकी, चिंचोडी पाटील, अरणगाव, चास-कामरगाव, नेप्ती अशा मोठ्या गावांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.
संवादभेटीतील महत्त्वाचे मुद्दे
गावातील वाद गावातच मिटविण्याचा प्रयत्न
ऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी मार्गदर्शन
तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन
महिला व मुलींना त्यांच्या हक्कांची माहिती देणे
गावातील अवैध धंद्दे बंद करण्याचे आवाहन
शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन
सोनसाखळी चोरांपासून सावधान राहण्याचे आवाहन.
पोलिस दल हे नागरिकांच्या सेवेसाठी आहे. ’सद्क्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्यासाठी आम्ही थेट जनतेत जात आहोत. गावातील वाद गावातच मिटावेत आणि नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, हाच आमचा प्रयत्न आहे.
-गणेश वारूळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक