

पुणतांबाः रोकड रकमेसह मौल्यवान दागिण्यांसह वाहन चोरीचे प्रकार सर्वश्रृत आहेत, मात्र पुणतांबेमध्ये चक्क 10 गाढवांची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी मध्यरात्री गाढवांच्या चोरीची घटना घडली.
पुणतांबा गावातील विजय लक्ष्मण गुंजाळ हे गाढवावरून वाळू, मुरूम व मातीची वाहतूक करून उदारनिर्वाह करतात, मात्र सध्या गोदावरी नदिला पाणी आल्याने त्यांचा व्यवसाय बंद आहे. त्यांनी गाढवं मोकळी सोडली आहेत. नेमकं याचाच गैरफायदा घेत, पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री गुंजाळ यांच्या मालकीची 10 गाढवं टेम्पोमध्ये घालून, चोरुन नेले. (Latest Ahilyanagar News)
या घटनेबाबत गुंजाळ यांनी, पुणतांबा पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दाखल केली आहे. तब्बल 10 गाढवांची चोरी झाल्यामुळे गुंजाळ यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात पुणतांबा गावातील दोन मंदिरांमधील मूर्तींची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करुन, आरोपीला अटक केली होती.
या घटनेनंतर पोलिसांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत गावामध्ये गस्त वाढवावी, ग्रामसुरक्षा दल स्थापन करावा, मुख्य चौकात आणखी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, गावात बेकायदेशीर राहणार्या लोकांचा तपास करून, पोलिसांकडे त्यांचा अहवाल सादर करावा, या विषयांवरील ग्रामसभेत झालेले ठराव, अद्यापही कागदावरचं आहे. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
येथील पोलिस दूरक्षेत्राला पुणतांबेसह दोन गावांचे कार्यक्षेत्र आहे. पोलिस कर्मचार्यांची संख्या वाढविण्यात येईल, असा ठराव त्यावेळी झाला होता, परंतू त्यावरही काहीच कार्यवाही झाली नाही. यामुळे गावासह परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे. कायम उपस्थित राहणार्या पोलिस कर्मचार्यांची गावात नेमणूक करावी, अशा मागणीचा सूर उमटत आहे.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद!
पुणतांबा गावातील कोपरगाव रस्त्यावरील एका गॅरेजसमोरील पटांगणात बसलेले 10 गाढवं लाल रंगाच्या आयशर टेम्पोमध्ये टाकून सहा चोरट्यांनी, चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. अजब चोरीची ही घटना गॅरेजसमोरील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. चोरी केल्यानंतर टेम्पो कोपरगावच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.