

राजेंद्र जाधव
अकोले: तालुक्यातील राजूर गावामध्ये तब्बल दोन महिने काविळच्या साथीने थैमान घातल्यामुळे दोन निरागस मुलींचा मृत्यू झाला. राजूरमध्ये 3,75 जणांना काविळीची लागण झाल्याची नोंद झाली. अजुनही गावात अधून- मधून काविळ रुग्ण आढळतात. या पार्श्वभूमीवर जुन महिन्यात राजूर गावातील 1,17 पाण्यांचे नमुने तपासण्याअंती तब्बल 35 पाणी नमूने दुषित आढळल्याचे वास्तव समोर आले आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यातील 4,15 पाण्याचे नमूने आरोग्य विभागाने तपासले. यापैकी सुमारे 41 पाण्याचे नमूने पिण्यासाठी अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याने संतप्त सूर उमटत आहे. (Latest Ahilyanagar News)
नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या ग्रामपंचायतींसह नगरपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीतील पाण्याच्या टाक्या स्वच्छता केल्या नाहीत. यामुळे पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गावासह वाड्या- वस्ती व शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत व नगरपंचायत प्रशासनाची असते.
नळाद्वारे प्रत्येकाला पाणी पुरवठा केला जातो. गावासह शहरात पाण्याच्या टाक्या आहेत. त्यांची सहा महिन्यातून एकदा स्वच्छता करणे गरजेचे असते, परंतू अनेकदा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याकडे डोळेझाक केली जाते. काही ठिकाणी पाईप लाइन लिकेज झाल्यामुळे अक्षरशः गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो.
याबाबत नागरिकांच्या सतत तक्रारी वाढत आहेत. खराब पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. या पाण्यामुळे आजार जडतात. दूषित पाणी पिल्यामुळे काविळ, अतिसार, विषमज्वर यासारखे आजार होतात. पाण्याचे क्लोरिनेशन योग्य न झाल्यास अपचनाचे विकार जडतात.
‘या’ गावांमध्ये आरोग्याची समस्या!
अकोले तालुक्यातील राजूर गावाला पाणीपुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीतील जलशुद्धीकरण यंत्रच बंद असल्यामुळे साथीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता, परंतू आरोग्य व ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून, टीसीएल पावडर टाकून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, जुन महिन्यात राजूर गावातील 1,17 पाण्याचे नमुने तपासण्याअंती 35 पाणी नमुने दुषित आढळल्याचे वास्तव समोर आले आहे.
खिरविरे गटात खिरविरे गावठाण सार्वजनिक विहिर, पाडोशी सार्वजनिक नळ योजना, पाडोशी भोरदरा सार्वजनिक विहिर, एकदरे सार्वजनिक विहिर, चंदगीरवाडी सार्वजनिक पाण्याची टाकी व जायनावाडी सार्वजनिक विहिरीत पाण्याचे नमुने पिण्यासाठी (दुषित) अयोग्य आल्यामुळे येथील गावकर्यांच्या आरोग्याची समस्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘अकोले तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत विभागाने नियमित पाणी नमूने तपासणी, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, गटारालगतचे पाण्याचे पाईप दुरुस्ती, नियमित टीसीएल, क्लोरीन हे पाणी शुद्धीकरणाचे घटक वापरणे. ग्रामीण विभागामध्ये ग्रामपंचायतींनी प्रामुख्याने उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. पाण्याचे नमूने नियमित 8 दिवसांनी तपासणी करणे बंधनकारक असावे. तपासणी अहवाल पंचायत समितीकडून सोमवार किंवा शुक्रवार या दिवशी प्रसिद्ध करण्यात यावा, पाणी टंचाईसह साथीच्या आजाराच्या काळात ग्रामसेवकांनी पूर्ण वेळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित रहावे. नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, नागरिकांना स्वच्छ प्रदूषणमुक्त पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा.
-बाजीराव दराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.