

कोळपेवाडी: कोपरगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरीकांची शासकीय कामात अडवणूक केली जात आहे. काही शासकीय अधिकार्यांकडून रकमेची मागणी केली जाते, अशा तक्रारी येत आहेत.
हा प्रकार गंभीर आहे, असा संताप व्यक्त करीत, सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील आर्थिक पिळवणूक सहन करणार नाही, असा सज्जड ईशारा आमदार आशुतोष काळे यांनी अधिकारी व कर्मचार्यांना दिला आहे. (Latest Ahilyanagar News)
आमदार काळे म्हणाले की, शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात, पण या प्रक्रियेत नागरिकांचे आर्थिक शोषण होता कामा नये. नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, जलद व लोकाभिमुख असावी. आवश्यक कागदपत्रे शासकीय नियमानुसार वेळेत देण्यात यावी.
वेळेअगोदर नागरिक अधिकार्याकडे कागदपत्रांची मागणी करीत नाही, मात्र केवळ आर्थिक हव्यासापोटी, सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरले जात असेल, तर अशा अधिकार्यांची गय करणार नाही. शासकीय यंत्रणेला जाब विचारणारे कोणी नाही, असे समजता कामा नये. शासकीय अधिकार्यांच्या कारभारावर मी बारीक नजर ठेवून आहे. यामुळे अधिकारी चुकीचे काम करताना आढळल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार काळे यांनी दिला.
सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर होवून, त्यांचे जीवन सुखदायी व्हावे, यासाठी शासन विविध समाजोपयोगी योजनांसह उपक्रम राबवते. योजना शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य गरजू जनतेपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मुख्य उद्देश आहे, मात्र या उद्देशाला काही शासकीय अधिकारी हरताळ फासून, त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. अशा अधिकार्यांना मी सोडणार नाही. अधिकार्यांनी ही बाब लक्षात घ्यावी, असा इशारा आमदार काळे यांनी दिला.
काम अडविल्यास वाईट परिणाम!
शासकीय अधिकारी व कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहेत, त्यांच्यावर मालकी हक्क गाजविण्यासाठी नाही. जनतेच्या कर रकमेतून अधिकारी-कर्मचार्यांना वेतन मिळते, याची जाणीव ठेवून जनतेच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न करू नका. शासकीय कार्यालयात नागरीकांचे काम अडविले, काम मार्गी लावण्यासाठी रक्कम मागितल्यास, त्याचे परिणाम वाईट होतील, असा निर्वाणीचा ईशारा आमदार आशुतोष काळे यांनी अधिकारी- कर्मचार्यांना दिला आहे.