

डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: अहिल्यानगरमधील रुग्णांना अल्पदरात रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रक्तपेढी सुरू केली. त्यांचा अनेक गरजू रुग्णांना लाभही झाला. वर्षाकाठी सुमारे बाराशे ते तेराशे रक्त पिशव्यांचे तिथे संकलन होत होते. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी गेल्या दीड महिन्यांपासून रक्तपेढी बंद असून, लाखो रुपयांची मशिनरी धूळखात पडून आहेत.
अहिल्यानगर शहरात महापालिकेचा कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात आहे. महिलांच्या प्रसूतीसाठी देशपांडे रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. तसेच, मनपाचे चार ते पाच ठिकाणी आरोग्य केंद्रही आहेत. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा आणखी सुलभ होण्यासाठी महापालिकेने बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात रक्तपेढी सुरू गेली होती. कोविड काळात रक्तपेढी काही काळ बंद होती. मात्र, कोविड काळ संपल्यानंतर पुन्हा तत्कालीन स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी पुढाकार घेऊन 70 ते 80 लाखांची मशिनरी खरेदी करून रक्तपेढी सुरू केली. बाह्य यंत्रणेमार्फत दहा कर्मचाऱ्यांची भरती केली होती. डिसेंबर 2025 पर्यंत रक्तपेढीचे कामकाज सुरळीत सुरू होते.
साधारण एका वर्षात रक्तपेढी विविध ठिकाणी कॅम्प घेऊन बारशे ते तेराशे रक्त पिशव्यांचे संकलन करीत होती. त्यावर प्रक्रिया करून अगदी अल्पदरात रुग्णांना रक्त पिशवी पुरविली जात होती. महापालिकेने रक्त पिशवीची किंमत अवघी 100 रुपये ठेवली होती. परंतु, डिसेंबर 2025 रक्तपेढीसाठी राबणाऱ्या बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांचा करार संपुष्टात आल्यानंतर पुन्हा रक्तपेढीला घरघर लागली. गेल्या दीड महिन्यांपासून रक्तपेढी बंद असून, लाखो रुपयांच्या मशिनरी धूळखात पडून आहेत. आता नव्याने महापौर आणि उपमहापौर महापालिकेत आले असून, त्यांनी रक्तपेढी सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
रक्तपेढी खासगीकरणाचा डाव
रक्तपेढी चालविण्यासाठी उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत आहे. चोवीस तपास वीज व तंत्रज्ञ कर्मचारी असा खर्च होतो. त्यामुळे रक्तपेढी खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यावर महापालिका प्रशासन सध्या विचाराधीन असल्याचे समजते.
कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात जाऊन रक्तपेढीच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. लाखो रुपयांची मशिनरी बंद राहणे योग्य नाही. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली आहे. लवकरच त्यावर निर्णय घेऊन रक्तपेढी पूर्ववत करण्यात येईल.
ॲड. धनंजय जाधव, उपमहापौर, अहिल्यानगर
गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांअभावी रक्तपेढीचे कामकाज बंद आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा झाली असून, त्यांनी बाह्य यंत्रणेमार्फत कर्मचारी भरण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रक्तपेढी पुन्हा सुरू होईल.
डॉ. शंकर शेडाळे, रक्त संक्रमण अधिकारी, मनपा