

नगर: जिल्ह्यातील 771 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना सोमवारी (दि.4) ग्रामपंचायत, सजा, पंचायत समिती व तहसील कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे लक्ष आता प्रभागनिहाय आरक्षण कार्यक्रमाकडे लागले आहे.
2025-26 या वर्षांत जिल्ह्यातील 771 ग्रामपंचायतींचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने प्रारुप प्रभागरचना तयार करुन 7 एप्रिल रोजी प्रसिध्द केली होती. या ‘प्रारुप’वर 13 एप्रिलपर्यंत हरकती मागविण्यात आल्या असता 771 ग्रामपंचायतींपैकी 618 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेवर एकही हरकत दाखल झाली नाही. मात्र, 153 ग्रामपंचायतींच्या प्रारुप प्रभागरचनेवर 384 हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक नगर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींबाबत 67 हरकतींचा समावेश होता.
दाखल झालेल्या हरकतींवर त्या त्या प्रांताधिकारी कार्यालयांत सुनावणी घेण्यात आली. काही हरकती मान्य करुन त्याप्रमाणे बदल करण्यात आला. काही हरकती फेटाळण्यात आल्या. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अंतिम मान्यता दिली. मान्यतेनंतर संबंधित तहसीलदारांनी सोमवारी आपापल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना प्रसिध्द केली आहे.
अंतिम प्रभागरचनेनंतर प्रभागनिहाय आरक्षण कार्यक्रम जाहीर केला जात आहे. आरक्षण कार्यक्रमानंतर मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या तीनही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जात आहे. त्यामुळे 771 ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांची आता आरक्षण कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.
तालुकानिहाय हरकती संख्या
अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, श्रीरामपूर 27, राहाता 25, राहुरी 44, नेवासा 59, नगर 60, पारनेर 88, पाथर्डी 79, शेवगाव 48, कर्जत 55, जामखेड 49, श्रीगोंदा 62.