

अहिल्यानगर : शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याची थरकाप उडविणारी घटना मंगळवारी अहिल्यानगरातील संगमनेर तालुक्यात घडली. वडगाव पान येथे घडलेल्या या संतापजनक आणि भयानक अशा घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अज्ञाताने केलेल्या ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, आ. अमोल खताळ यांनी या गंभीर प्रकाराची राज्य विधिमंडळाच्या अधिवशेनात माहिती देऊन सरकारचे लक्ष वेधले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 13 वर्षांच्या मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून, ती मामाकडे शिक्षणासाठी राहण्यास आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना रस्त्यावर अज्ञाताने तिच्यावर ॲसिड हल्ला केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे नागरिक मदतीला धावले. त्यांनीच तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमी मुलीची प्रकृती स्थिर असली, तरी ती प्रचंड घाबरली असून, दबावाखाली आहे. हल्लेखोर हल्ला केल्यानंतर पसार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर स्थानिकच असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली. मुलीची आई आणि मामाला धीर देताना गुन्हेगारांचा तातडीने शोध घेऊन त्यास अटक करावी तसेच महिला सुरक्षेसाठी सरकारने कडक कायदे करावेत, अशी मागणी थोरात यांनी केली. आ. अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात ही घटना मांडत सरकारचे लक्ष वेधले. मंत्री विखे-पाटील यांनी घटनेची माहिती घेत पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच, मुलीवर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करत सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत मंत्री विखे-पाटील यांनी तातडीने तपासाचे निर्देश दिले.