

कोपरगाव: थकबाकी वसुलीसाठी कोपरगाव नगपरिषदेने ‘अभय योजना’ राबविण्याच्या घेतलेल्या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. या योजनेत 21 मार्च 2025 पर्यंतच्या शास्तीतील 50 टक्के शास्ती माफी मालमत्ताधारकांना मिळणार आहे.
मालमत्ताधारकांना 31 मार्च 2025 पर्यंतच्या शास्तीपैकी 50 टक्के रक्कम माफ करण्याच्या पालिकेच्या प्रस्तावास 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली. थकीत मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के शास्ती आकारली जाते. मालमत्ता करापेक्षा शास्तीचा आकडा फुगल्याने मालमत्ता-धारकांकडून ती भरण्यास टाळाटाळ होते.
परिणामी नगरपरिषदेची थकबाकी वाढली जाते. थकीत कराच्या वसुलीस प्रोत्साहन देण्यासाठी शास्ती माफीच्या स्वरूपात अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण थकीत कराचा भरणा केल्यास 31 मार्च 2025 पर्यंतच्या शास्तीवर 50 टक्के माफी मिळणार आहे. ही योजना केवळ एकदाच लागू राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.