

नगर : भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत निवडणुका गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, अहिल्यानगर शहरातील चार मंडलाच्या निवडी अंतर्गत गटबाजीच्या कारणावरून रखडल्या होत्या. मात्र, अखेर पक्षेश्रेष्ठींनी लक्ष घालत चारही मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. त्यामुळे सुंदोपसुंदीच्या राजकारणाला पूर्ण विराम मिळाला. मध्य शहर, सावेडी, भिंगार व केडगाव मंडलाध्यक्षपदी अनुक्रमे मयूर बोचूघोळ, सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, सचिन जाधव व भरत ठुबे यांना संधी मिळाली.
भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत निवडणुका संपूर्ण राज्यात निवडणुका सुरू आहेत. शहर व ग्रामीणसाठी स्वतंत्र निवडणुका होत आहे. सध्या ग्रामीण भागातील निवडणुका पूर्ण झाल्या असून, सर्वत्र तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक तालुक्यात दोन-दोन अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत. त्यातही अनेकांनी नाराजीचा सूर आवळत वरिष्ठकांकडे तक्रारी केल्याचे समजते. सध्या स्थानिक पक्षश्रेष्ठी त्यांची समजूत काढत आहेत.
दरम्यान, दुसर्या बाजूला अहिल्यानगर शहरात चार मंडलाच्या निवडणुका तांत्रिक कारणासह अंतर्गत नाराजीमुळे रखडल्या होत्या. त्याला अंतर्गत गटबाजीचे राजकारण कारणीभूत होते. त्यामुळेच निवडी लांबणीवर गेल्याचे समजते. तशी चर्चाही भाजपच्या पदाधिकार्यामध्ये होती. मंडलाध्यक्ष पदासाठी 18 मुद्द्यांचे निकष ठरविण्यात आले होते. मंडलाध्यक्ष पदासाठी संबंधित सदस्य पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता असणे आवश्यक होते. त्याने पक्षाच्या संघटन पातळीवर विविध उपक्रमामध्ये सहभाग असणे अपेक्षित होते. अहिल्यानगर शहरामध्ये मंडलाध्यक्ष निवडीवरून सुंदोपसुंदीचे राजकारण सुरू होते. आज अखेर पक्षश्रेष्ठी चारही मंडलाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. मध्य शहर मंडलाध्यक्षपदी मयूर बोचूघोळ, भिंगार मंडलाध्यक्षपदी सचिन जाधव, सावेडी मंडलाध्यक्षपदी सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, केडगाव मंडलाध्यक्षपदी भरत ठुबे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागात मंडलाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहरी भागात मंडलाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्याने आता जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहेत.