धुळे पुढारी वृत्तसेवा-खरीप हंगाम २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात ३ लाख,७९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी मुख्य पिक कापुस, मका, बाजरी, ज्वारी इत्यादी आहेत. कापुस पिकाची साधारण २ लाख १९हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल असा अंदाज आहे. त्याखालोखाल मका ६७ हजार ७२४ हेक्टर तर बाजरी पिकाचे क्षेत्र ३८ हजार १६० हेक्टर इतके आहे.
खरीप हंगामाकरीता एकुण २७ हजार २४५ क्विटल बियाणांची मागणी विविध पिकांकरीता करण्यात आली आहे. त्यापैकी आजअखेर १९ हजार ५३३ क्विटल बियाणे पुरवठा झालेला आहे. उर्वरीत बियाणांचा पुरवठा सुरु आहे. तसेच बी.टी. कापुस पिकाचे १० लाख ,९९ हजार ४०० बियाणे पाकीटांची मागणी करण्यात आली होती. बियाणे कंपनी यांनी दिलेल्या नियोजनापैकी ८ लाख ४२ हजार ८९२ बियाणे पाकीटे जिल्ह्यात पुरवठा झालेली आहेत. तसेच उर्वरीत बियाणे पाकीटाचा पुरवठा सुरु आहे. त्यामुळे जिल्हाभर पुरेसे बियाणे उपलब्ध झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडुन ज्यादा दराने बियाणे खरेदी करु नये. बियाणे खरेदी करतांना अधिकृत वितरकाकडून पक्क्या बिलावर बियाणे खरेदी करावे. शेतकरी बांधवांनी कापुस बियाणे खरेदी करतांना ठराविक वाणांचा आग्रह धरु नये. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यात खतांचा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे. खरीप हंगामाकरीता एकुण १ लाख ३३ हजार ६०० मे.टन ची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख ५ हजार ८०० मे.टन चे जिल्ह्यास आवंटन मंजुर झालेले आहे. आज अखेर जिल्ह्यात मागील उपलब्ध साठा व एप्रिल, मे महिन्यात प्राप्त साठा मिळुन एकुण ५२ हजार १९४ मे.टन एवढा पुरेसा खत साठा वितरकांकडे उपलब्ध आहे. महिनानिहाय मंजुर आवंटनाप्रमाणे उर्वरीत खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे. खत नियंत्रण आदेश, १९८५ चे उल्लंघन प्रकरणी एका वितरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बफर साठी युरीया ४,७९० मे.टन, डी.ए.पी. २८० मे.टन चे लक्षांक आहे. आज अखेर युरीयाचा २१९२.२३ मे.टन व डी.ए.पी.चा ७३ मे.टन बफर साठा झालेला आहे.
जिल्ह्यात बियाणे व खते सुरळीत पुरवठा करण्याकरीता सर्व बियाणे खत कंपनी प्रतिनिधी व प्रमुख घाऊक विक्रेते यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण व आढावा तसेच प्रत्येक तालुकास्तरावर निविष्ठा विक्रेते यांचे प्रशिक्षण व आढावा घेण्यात आला आहे. जिल्ह्यात कार्यरत एकुण १६ गुणनियंत्रण निरिक्षकांकडून सदर निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करण्यात येत आहे.
तसेच जिल्हास्तरावर १ भरारी पथक व तालुका स्तरावरील ४ असे एकुण ५ भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत असून सदर भरारी पथकांकडून निविष्ठा केंद्राची अचानक तपासणी करण्यात येत आहे. तपासणी केल्यानंतर निविष्ठा केंद्र चालकांनी त्रुटी पुर्तता न केल्यास परवानावर कार्यवाहीसाठी प्रस्ताव परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल.
कृषि विभागामार्फत प्रतिबंधीत कापुस एचटीबीटी बियाणे विक्रीबाबत २ पोलिस केसेस व ज्यादा दराने कापुस बियाणे विक्री बाबत २ पोलिस केसेस करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी कुठल्याही गैरसमजुतीला बळी न पडता प्रतिबंधीत एचटीबीटी कापुस पिकाचे बियाणे खरेदी करु नये. तसेच पुरेसे बियाणे उपलब्ध असल्यामुळे ज्यादा दराने देखील खरेदी करु नये. शेतकऱ्यांना बियाणे व खते बाबत तक्रार नोंदविण्याकरीता जिल्हास्तरावर गुणनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके बाबत काही अडचण असल्यास गुणनियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक ०२५६२ २३८१८७, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५६३९४६८, मोहिम अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांचे भ्रमणध्वनी क्रमांक ९४०३४१५६७५ अथवा नजीकच्या कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
हेही वाचा –