

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: जामनेर तालुक्यातील वाकडी येथे ९० वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाला. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी १२ ते १ च्यादरम्यान घडली आहे. हा खून वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिन्यांसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
जामनेर तालुक्यातील वाकडी येथे राधाबाई भालचंद परदेशी (वय ९०) या एकट्याच राहतात. काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (वय ६५) परिवारासह राहतो. तर दोन मुलींची लग्न झालेली आहेत. शनिवारी मुलगा सुभाष हा ११ ते ११.१५ च्या सुमारास आईच्या घरी गेला होता.
दुपारी १२ ते १ दरम्यान अज्ञात मारेकऱ्याने खून केला. राधाबाईंच्या मुलीला दरवाजा उघडा दिसला असता तिने आत जाऊन पहिले असता हा प्रकार लक्षात आला. मृत राधाबाईच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. कानातील दागिने ओरबडून काढलेले होते. पोलिसांनी मृतदेह जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
आज (दि.१२) शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, ग्रामस्थांनी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला. गावात अवैध धंदे बोकाळले असल्यामुळे ग्रामस्थांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे हे धंदे बंद करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी अप्पर एसपी कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांना, अवैध धंदे बंद करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. पुढील तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश फड करीत आहेत.
हेही वाचा