नाशिक सोडून जाण्याचा प्रश्नच नाही! अमोल कोल्हे यांच्या गौप्यस्फोटानंतर भुजबळांची प्रतिक्रिया | पुढारी

नाशिक सोडून जाण्याचा प्रश्नच नाही! अमोल कोल्हे यांच्या गौप्यस्फोटानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते. मात्र, भुजबळांनी शिरूरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आल्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, नाशिकमधून माझे नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढता का? अशी विचारणा केली होती. शिरूरमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता. मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.

भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, मला उमेदवारी नाही म्हणून कोणी नाराज आहे असे नाही. लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करत असतात. सगळ्या गोष्टी आता मागे गेल्या आहेत.

हेही वाचा –

Back to top button