जितेंद्र आव्हाड जळगावात येताच घामाघूम, जिल्हाधिकारी कार्यालयात एसीचा शोध
जळगाव- महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. एकीकडे निवडणुकीचा ज्वर तापत असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्याचे तापमान 41 अंश सेल्सियसपेक्षा अधिक आहे. अशात जिल्हाधिकारी कार्यालयात येताच आव्हाडांनी एसी कुठे सुरू आहे याची विचारणा केल्याने त्यांना जळगावचे तापमान सहन न झाल्याची चर्चा रंगली.
जळगाव जिल्ह्याचे तापमान व राजकारण दोन्ही तापायला लागले आहे. अशात आज आघाडीचे रावेर लोकसभा व जळगाव लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संजय राऊत हे उपस्थित होते.
जळगाव शहराचे तापमान 41 अंशावर असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मान्यवर व उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले. त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जितेंद्र आव्हाड हे वर येऊन त्यांनी येथे एसी कुठे सुरू आहे अशी सर्वप्रथम विचारणा केली. त्यामुळे त्यांना जळगावचे तापमान सहन झाले नाही व उन्हाचे चटके चांगलेच बसलेले दिसून आले. ते घामाघुम झाले असल्याने लागलीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ते शिरले.