![सिडको : सिडकोतील विलास पांगारकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या तब्येतीची चौकशी करताना मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2F%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा- आचारसंहीता लागण्यापुर्वी सगेसोयरेचा निर्णय घेतला पाहिजे. मराठा आरक्षणाचे सरकारला गांभीर्य नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. नाहीतर राजकीय नेत्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. असा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
नाशिकमध्ये मराठा आरक्षणावेळी आंदोलन करणारे नेते विलास पांगारकर यांचा अपघात झाल्याने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सिडकोतील सुंदरबन कॉलनी येथे त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आतापर्यंत आरक्षण मिळावं यासाठी ३५० पेक्षा जास्त मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. तरीही सरकार ला गांभीर्य नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. राजकर्ता हा जनतेचे प्रश्न सोडविणारा असावा. मात्र सद्याचे राज्यकर्ते हे सत्तेचे आणि भुकेले आहेत. खुर्चीसाठी धावतात. ६ कोटी मराठा बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो जर नाही सोडविला तर आम्ही राजकीय नेत्यांना गुलाल लागू देणार नाही असा थेट इशारा जरांगे यांनी दिला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर,, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड चुंचाळे चे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे सह या वेळी मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .