जळगाव : तीन मंत्र्यांसह आमदारांना आम सभेचा विसर | पुढारी

जळगाव : तीन मंत्र्यांसह आमदारांना आम सभेचा विसर

नरेंद्र पाटील, जळगाव- ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती येथे होणाऱ्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली होणारी आमसभा चाळीसगाव तालुका सोडल्यानंतर उर्वरित 14 तालुक्यांमध्ये अद्याप पर्यंत झालेली नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांच्या तालुक्यात देखील अद्याप पर्यंत आमसभा झालेली नसल्याचे उघड झाले आहे. मंत्र्यांसह इतर आमदारांना येत्या काळात होणाऱ्या लोकसभेचे वेध लागलेले आहेत. मात्र आमसभा घेण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. जिल्ह्यातील आमदारांना व मंत्र्यांना आमसभेचा विसर पडलेला दिसून येत आहे.

जिल्हा परिषद हे ग्रामीण भागासाठी मिनी मंत्रालय आहे. या मिनी मंत्रालयाचा एक भाग म्हणजे पंचायत समिती जो तालुका स्तरावर असतो. या ठिकाणी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा घेण्यात येत असते. मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यासह उर्वरित सात आमदारांना आम सभेचा विसर पडलेला आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी 18 सप्टेंबर 2023 रोजी आम सभा घेतली आहे. 2019 नंतर करोना काळ व कोरोना काळानंतर झालेल्या राज्यातील उलथापालथ या राजकीय खेळीमुळे नागरिकांच्या प्रश्नाकडे किंवा नागरिकांच्या प्रश्न मांडण्याची जागा असलेली आमसभा कोणत्याही तालुक्यात झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी व पक्ष आमदार अशी अकरा आमदारांची संख्या आहे. यामध्ये आता राजकीय उलथापालथीनंतर भाजपाचे आमदार आहेत परंतु पूर्वीच्या शिवसेनेतील आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ धरल्यामुळे शिवसेनेचे दोन भाग जिल्ह्यात पडलेले आहेत. सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एकही आमदार जिल्ह्यात नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची दोन गट झाल्यामुळे एकमेव आमदार असलेले अनिल भाईदास पाटील यांनी अजित पवार गटाचा हात धरल्यामुळे शरद पवार गटाचा एकही आमदार जिल्ह्यात राहिलेला नाही.

या राजकीय उलटापालथीमुळे ग्रामीण भागातील किंवा पंचायत समितीत होणाऱ्या आमसभेकडे 10 आमदाराचे लक्ष गेले नाही आता लोकसभेचे निवडणुकांचे वेध लागले असल्याने पक्षाचे संपर्कप्रमुख व पक्षाच्या बैठका मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. मात्र आमसभेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामीण भागातील समस्या व प्रश्न काय हे आजपर्यंत मांडण्यात आलेले नाही. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधलेला असता आमसभेचे अध्यक्ष हे आमदार असतात त्यांना ते त्यांच्या सोयीने तारीख काढतात त्या दिवशी आमसभेचे आयोजन करण्यात येते असेच उत्तरे मिळाले.

जिल्ह्याचे पालकमंत्री व जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनीही आजपर्यंत आमसभा घेतलेली नाही. त्यानंतर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्याही जामनेर तालुक्यात आमसभा झालेली नाही. तर राज्याचे आपत्ती विभागाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनीही अमळनेर तालुक्यात आमसभा घेतलेले नाही. शिंदे गट चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, लताबाई सोनवणे, किशोर आप्पा पाटील, भाजपा संजय सावकारे, सुरेश भोळे, काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी येथेही आमसभा झालेली नाही.

Back to top button