जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी आक्रोश मोर्चा | पुढारी

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी आक्रोश मोर्चा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यांनी अंमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.

जयंत पाटील जळगाव येथे शेतकरी आक्रोश मोर्चात बोलत होते. त्यांनी सांगितले की, “जिल्ह्यात मदत व पुनर्वसन मंत्री असूनही ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचा पीक विमा आहे त्यांना ताबडतोब मदत द्यावी. दोन-चार आठ दिवसात व्यवस्था करावी. नाहीतर अंमळनेर तालुक्याचा तरी प्रश्न सोडला तरी चालेल.”

शेतकरी आक्रोश मोर्चा हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर त्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, अरुण भाई गुजराती, एकनाथ खडसे यांची भाषणे झाली. या मोर्चामध्ये लक्षवेधी ठरले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवीत शेतकऱ्यांबरोबर या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले. मोठ्या प्रमाणात शेतकरी आपलs ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. तर एक महिला बैलगाडी चालविता दिसली.

यावेळी पाटील म्हणाले की, “मदत व पुनर्वसन मंत्री हे नवीन आहेत. सरकार ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या व यांच्या भेटीगाठी झालेल्या नाहीत. ज्यांच्या ताब्यात निर्णय घेण्याचे अधिकार आहे त्यांना हे भेटलेले नसतील त्यामुळे ते मदत पोहोचण्यात कमी पडताना दिसत आहे.” पाटील यांनी सरकारवर टीका केली की, “हे सरकार किती लबाड बोलते. ज्या घोषणा केल्या त्याचा एक पण लाभ शेतकऱ्याला झालेला नाही.”

ते म्हणाले की, “गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. कारखानाला देण्यासाठी पाणी आहेत मात्र शेतकऱ्यांना दारात पाणी सोडण्यासाठी तयार होत नाही. उद्योगांना पाणी आहे मात्र शेतकऱ्यांना पाणी नाही.” पाटील म्हणाले की, “राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले आहेत कारण डिझेल वाढले आहेत, खतांच्या किमती वाढल्या आहेत, बियाण्याचे भाव वाढले आहेत. ते खरे आहे की खोटे आहे याची पण शाश्वती नाही. यात भरडण्याचे काम सरकार करीत आहे.” पाटील म्हणाले की, “या जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची ताकद पोहोचत नाही किंवा त्यांना अधिकार नसतील. त्यांना अधिकार नसेल तर मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घातले पाहिजे व जळगावच्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे.” जिल्ह्याच्या दूध संघात शेतकऱ्यांना 30.50 पैसे दुधाला भाव मिळत आहे. जेव्हा की या दूध संघाचे चेअरमन हे राज्याच्या कमिटीचे मेंबर आहेत व या कमिटीने निर्णय घेतला आहे की 34 रुपये दर मिळाला पाहिजे. जेव्हा की या शेतकऱ्यांना जळगाव जिल्हा दूध संघात 30 रुपये दर मिळत आहे मग हा चार रुपयाचा फरक या मंत्र्यांच्या जमिनीच्या सातबारावर चढायला पाहिजे.”

Back to top button