![नाशिक: कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2F%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A5%8D.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
देवळा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मार्केट कमिटीमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कांदा लिलाव पूर्ववत करण्यात यावेत, अन्यथा मंगळवारी (दि. ३) जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार व आमदारांना कांदा भेट देऊन मार्केट सुरळीत करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन तात्या बोराडे यांनी आज (दि.१) येथे दिली.
कांदा लिलाव सुरू करण्याबाबत व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज देवळा येथे शेतकरी संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कांदा प्रश्ना संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी कांदा निर्यात शुल्क शून्य करणे, नाफेडने सरसकट कांदा खरेदी करावी, कांदा भाव हा २ हजार ते साडे चार हजार प्रति क्विंटल असावा, आदी मागण्या शासनाकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारी (दि. ३) नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकरी आक्रोश रथ फिरणार असून जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येणार आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन तात्या बोराडे, देवळा तालुका अध्यक्ष माणिक निकम, उपाध्यक्ष किरण निकम, शेतकरी संघटनेचे शैलेंद्र आबा कापडणीस, तालुकाध्यक्ष केशव बापू सूर्यवंशी आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा