जळगाव : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. त्यामुळे 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज (दि.५) जळगाव दौऱ्यावर आहे. त्यांनी अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला. याप्रसंगी शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मत व्यक्त केले आहे.
जालन्यात मराठा आंदोलकावंर जो लाठीचार्ज झाला. त्यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणं आहे. मला इतकं माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथं पोलिसांनी हल्ला केला हे उघडपणे दिसतं. ऑर्डर कोणी दिली याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत, असं शरद पवार म्हणाले. गोवारीचा लाठीहल्ला झाला नाही, तर चेंगरा चेंगरी होती असं शरद पवार म्हणाले.
राज्यातल्या काही जिल्ह्यात चिंताजनक स्थिती….
राज्यातल्या काही जिल्ह्यात सामान्य लोकांच्या दृष्टीने चिंताजनक स्थिती आहे. त्याचा आढावा घेऊन लोकांशी संपर्क साधावा या हेतूने हे दौरे आहेत. यापूर्वी मराठवाड्यातील बीड, त्यानंतर कोल्हापूर इथे जाऊन आलो. आज खान्देशातील स्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पाऊस नसल्याने चिंताजन स्थिती आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बिकट आहे याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधलं.
सरकारकडून आढावा घेण्याची आवश्यकता…
सगळं चित्र चिंताजनक आहे. लोड शेडिंगची बिकट परिस्थिती आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती, तर दुसरीकडे विजेचा तुटवडा आहे. 1 रुपयांच्या विम्याचा प्रश्न एवढंच नाही, तर सरकारकडून याबाबत आढावा घेण्याची आवश्यकता आहे. दुष्काळ अजून जाहीर करायचा नसेल, तरी त्याची तयारी आतापासून करावी लागेल. किमान नोंदी घेऊन माहिती तरी गोळा करावी लागेल. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल, अस शरद पवार म्हणाले.
भारत आणि इंडियात काही फरक नाही…
इंडिया नाव हटवण्याबाबत मला काही माहिती नाही. इंडिया नाव हटवण्याचा कोणाला अधिकार नाही. भारत काय आणि इंडिया काय काही फरक पडत नाही . इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी सरकार अस्वस्थ झालं आहे. संसदेत महिला आरक्षण विधेयक आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार. भाजपाचे उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी काम करु असं शरद पवार यांनी सांगितलं.