धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा | पुढारी

धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची संख्या प्राधान्याने निश्चित करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बुधवार (दि.10) दिल्या आहेत.

‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि.10) झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कंचन वानेरे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी कैलास देवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव अमोल शिंदे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाचे नाव बदलून आता ‘शासन आपल्या दारी’ हे नाव देण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे इत्यादी कार्यवाही 15 मे पूर्वी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. ‘शासन आपल्या दारी‘ या उपक्रमातंर्गत जिल्हा व तालुकास्तरावर 15 जून पूर्वी दोन दिवसांच्या शिबिरांचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाचा असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टीने परिपूर्ण नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहनही शर्मा यांनी यावेळी केले.

अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची हा उपक्रम आयोजनामागील भूमिका विशद करुन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच देवरे यांनी प्रत्येक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन योजनानिहाय लाभार्थी निवडीबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अंतुर्लीकर यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button