नाशिक मुंबई हायवेला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा ट्विटद्वारे संताप | पुढारी

नाशिक मुंबई हायवेला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखांचा ट्विटद्वारे संताप

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : 

लेखक, दिग्दर्शक व नाटककार प्राजक्त देशमुख यांच्या गाडीला नाशिक मुंबई हायवेवर अपघात झाला आहे. प्राजक्त देशमुख यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे. परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम? असा संतप्त सवाल प्राजक्त देशमुख यांनी ट्विट केला आहे.

ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता. अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असतांना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवाव्या लागत असल्याचे प्राजक्त देशमुख यांनी म्हटले आहे.

प्राजक्त देशमुख यांचे ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक 2017 मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर आले. 2020 मध्ये या नाटकाच्या संहितेला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच गोदावरी या सिनेमाचे संवाद लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button