Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात
नाशिक, उगांव ता. निफाड : पुढारी वृत्तसेवा
द्राक्षपंढरी अर्थात नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सलग दुस-या दिवशी आज मंगळवार (दि. १०) निफाडला पारा ५ अंशावर स्थिरावला आहे. शेकोटीभोवती गावागावात गप्पांचे फड रंगत आहेत. ऊबदार कपड्यांसह ग्रामीण भागात नागरिकांचा फेरफटका नजरेत भरु लागला आहे. तर दुसरीकडे द्राक्षबागा संकटात आल्याने द्राक्षउत्पादक चिंतेत आहेत.
कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षपंढरीत मणी तडकण्याचा धोका कायम आहे. काचेसारख्या अवस्थेत द्राक्षमणी येत आहे. अशात तडे गेलेल्या द्राक्षमण्यांची विरळणी करण्याचा बागायतदारांचा खर्च वाढणार आहे. अशा कडाक्याच्या थंडीत द्राक्षबागांमध्ये पहाटेच्या वेळी पाणी देणे, शेकोटी पेटवून धुर करणे असे उपाय सुरु आहेत.
पारा घसरत असल्याचा फायदा रब्बीच्या गहु, हरभरा, कांदा या पिकांसाठी आहे. मात्र सध्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, नाशिक तालुक्यात द्राक्षबागांचा हंगाम सुरु होण्यावर आहे. शेकडो एकर द्राक्षबागा या फुलोरा अवस्थेकडून मणी सेटींग व परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे घसरलेले तापमान हे द्राक्ष बागायतदारांच्या मुळावर येण्याचा धोका आहे. या थंडीमुळे तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या अवस्थेत द्राक्ष मण्यांमध्ये गोडवा निर्माण होत असतो. मात्र, तापमान घसरल्याने द्राक्षमण्यांना तडे जाऊन द्राक्षमालाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.