नाशिक : निफाडचा पारा ५ अंशावर; द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला | पुढारी

नाशिक : निफाडचा पारा ५ अंशावर; द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला

नाशिक (उगांव ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यासह सर्वच ठिकाणी सुर्यदर्शन होत नसल्याने वातावरण बदल झालेला आहे. सोमवार दि. ९ रोजी निफाडला पारा थेट ५ अंशावर घसरला असल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात करण्यात आली आहे. यामुळे द्राक्षपंढरीत मणी तडकण्याचा धोका वाढला आहे.

पारा घसरत असल्याचा फायदा रब्बीच्या गहू, हरभरा, कांदा पिकांसाठी असला तरी, सध्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, नाशिक तालुक्यातील संपूर्ण द्राक्षबागांचा हंगाम सुरु होण्यावर आहे. शेकडो एकर द्राक्षबागा या फुलोरा अवस्थेकडून मणी सेटींग व परिपक्व होण्याच्या स्थितित आलेले आहे. त्यामुळे घसरलेले तपमान हे द्राक्ष बागायतदारांच्या मुळावर येण्याचा धोका आहे. थंडीमुळे तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या अवस्थेत द्राक्षबागेतील द्राक्षघडांचे मण्यांमध्ये गोडवा निर्माण होत असतो. काचेसारख्या अवस्थेत द्राक्षमणी येत आहे. त्यातच तापमान घसरल्याने द्राक्षमण्यांना तडे जाऊन द्राक्षमालाचे नुकसान होण्याची दाट शक्यता वाढली आहे. तडे गेलेल्या द्राक्षमण्यांची विरळणी करण्याचा खर्च बागयतदारांना वाढणार आहे. अशा कडाक्याच्या थंडीत द्राक्षबागांमध्ये पहाटेच्या वेळी पाणी देणे ,शेकोटी पेटवुन धुर करणे असे उपाय द्राक्षबागायतदारांना करावे लागत असल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी दै. पुढारीला सांगितले.

हेही वाचा:

Back to top button