नाशिक : मोबाइलच्या कारणावरून मालेगावी तरुणाचा खून
नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
घेतलेला मोबाइल परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना मालेगाव शहरातील गांधीनगर भागात काल शुक्रवारी (दि.25) रात्री 12.30 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मृत शेख सुलेमान ऊर्फ सलमान शेख शकील (25 नुमानीनगर, मालेगाव) याचा मोबाइल आरोपी आरिफ खान आसिफ खान (29 गांधीनगर, मालेगाव) याचे कडे होता. सदर मोबाइल घेण्यासाठी मृत शेख सुलेमान गेला होता. यावेळी मोबाइल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. याचदरम्यान आरोपी आरिफ खान याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्या डाव्या हाताच्या खाली पाठीमागे वार केला. यात शेख सुलेमान हा गंभीर जखमी झाला. त्यास त्याचे मामा यांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी शेख लुकमान शेख उस्मान (44 रोशनाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आरिफ खान याचे विरुद्ध आझादनगर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरात हळहळ…
मृत शेख सुलेमानच्या भावाचे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या धक्क्यातून कुटुंबीय सावरत असताना काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील आरोपी हा गुजरात राज्यातील असून, त्याचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे समजते.