पिंपळनेर : तहसिल कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा
पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
येथील आदिवासी एकता परिषदेच्या कार्यालयापासून आदिवासी वाद्याच्या गजरात आदिवासी शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाला सुरुवात करण्यात आली. पोलीस स्टेशन मार्गे सामोडा चौफुली, बसस्टॅन्ड चौफुली, मेनरोड, खोल गल्ली, नाना चौक मार्गे अप्पर तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये प्रेमचंद सोनवणे यांनी संघटना व मागण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, एकलव्य आदिवासी भिल संघटना महाराष्ट्र प्रदेश, एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद, आदिवासी बचाव अभियान साक्री तालुका या संघटनांनी मोर्चात सहभाग नोंदवत कोकणा कोकणी समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डोंगरभाऊ बागुल यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या मांडण्यात आल्या. साक्री तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करुन फाॅरेस्ट मधिल जमिन खेडूत वन कब्जेदार यांसह पंचनामे करून भरपाई देण्यात यावी. प्रत्येक आदिवासी वस्तीत ५ एकर स्मशानभूमी (दफनभूमी) साठी शासनाने जागा देवून ७/१२ उतारा नावे करून ताबडतोब द्यावा. तसेच अनेक ठिकाणी स्मशानभूमीवर अतिक्रमण झाले आहेत. ते शासकीय यंत्रणेमार्फत ताबडतोब हटवावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अनिल उचाळे यांना देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रीय पूर्व युवा अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, राज्य सदस्य अण्णा पवार, मनोज देसाई, रमेश माळी, सोमनाथ चौधरी, मंजी मावळी, अध्यक्ष रविंद्र मालुसरे जि.अध्यक्ष, अजय देसाई, संजय एम. ठाकरे, ता. अध्यक्ष रविंद्र अहिरे, बाळू पवार, कांतिलाल पवार, भिकनदादा पवार, कैलास देसाई, रेणूबाई गवळी, सल्लागार अनिल गायकवाड, हुसेन मोरे, तानाजी बहिरम, रविंद्र अहिरे, दादा पवार, पोचल्या मावळी यांच्यासह महिला व पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये अनुचित प्रकार घडू नये याकरीता पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक भाईदास माळचे, प्रदिप सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.