नंदुरबार: अरेरावी करणाऱ्या तहसीलदारांची बदली करण्याची मागणी
नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीतील अर्ज माघारी प्रसंगी नंदुरबार येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अरेरावीची भाषा केली, असा आरोप करीत त्यांच्या बदलीची मागणी नंदुरबार जिल्हा युवती सेनेच्या जिल्हाध्यक्ष मालती वळवी यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील दुधाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मालती वळवी यांनी सरपंच पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मालती वळवी गेल्या होत्या. त्यावेळी यांच्याकडून अर्जावर सही न घेताच घाईगडबडीत अर्ज जमा करून घेतला, असे तक्रारी अर्जात म्हटले आहे.
त्यामुळे मालती वळवी यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन माघारीचा अर्ज तपासणी करण्याची मागणी केली. परंतु तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ऑनलाइनचे कारण देत अरेरावीची भाषा केली. म्हणून तहसीलदार थोरात यांची तात्काळ बदली करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख मालती वळवी, सुनिता पाडवी यांनी निवेदनातून केली आहे.
हेही वाचलंत का ?