Navneet Rana : त्याचा वध केला आणि घरी बसवले ; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव शहरातील बालाजी पेठेत महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी हजेरी लावली. यावेळी राणा दाम्पत्याने सामूहिक हनुमान चालिसा पठण केले. यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली, ‘ज्याचा वध करायचा होता, त्याचा वध आम्ही केला आणि त्याला घरी बसवले’, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यावरील संकट दूर होण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा पठण केली. मात्र, ठाकरे सरकारने आम्हाला कारागृहात टाकले होते. निर्दोष असतानाही आम्हाला १४ दिवस कारागृहात राहावे लागले. ज्याचा वध करायचा होता, त्याचा वध आम्ही केला आणि त्याला घरी बसवले. एका महिला खासदाराला कारागृहात टाकण्याचे काम त्यांनी केले. त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली,’ अशा शब्दांत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली आहे.
औरंगाबाद : वीज कट करण्याचा फेक मेसेज पाठविणार्यास ‘शॉक’
शिंदे सरकारच्या कामगिरीचे कौतुक…
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन जनतेच्या हितासाठी काम करणारं सरकार स्थापन झालं आहे. आताचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जिवाचे रान करून काम करीत आहेत. गेल्या अडीच वर्षांत जेवढे काम झाले नाही, ते दीड महिन्यातच या सरकारने केले, असे म्हणत खासदार राणा यांनी शिंदे सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.
‘लव्ह जिहाद’ विरोधात मोहीम राबविणार…
देशात ‘लव्ह जिहाद’ची समस्या वाढत असून, ही बाब धोकादायक आहे. त्यामुळे आगामी काळात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारणार आहोत. अमरावती जिल्ह्यापासून आम्ही त्याची सुरुवात केली आहे. अमरावती जिल्ह्यातील ज्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या कचाट्यात सापडल्या आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचे काम सुरू आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी ‘लव्ह जिहाद’च्या कचाट्यात कोणी सापडले असतील, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांना आम्ही मदत करू,’ असे आवाहनही त्यांनी केले.