नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : डॉ. भारती पवार | पुढारी

नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या अर्थव्यवस्थेत छोटे उद्योग व्यावसायिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने, छोट्या उद्योगांना पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देऊन या व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. जिल्ह्यात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असून, यातूनच सबका साथ आणि सबका विकास होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘पीएम स्वनिधी महोत्सव’, स्वावलंबी पथविक्रेता यांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना. डॉ. पवार बोलत होत्या. कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फारांदे, विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नगर पारिषद प्रशासनाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुलकर, महानगरपलिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, महानगरपालिकेच्या उपआयुक्त करुणा डहाळे, विभागीय माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे यांच्यासह लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, प्रदीप पेशकर, हिमगौरी आडके-आहेर, स्वाती भामरे, प्रशांत जाधव, सुनील केदार, जगनअण्णा पाटील, वर्षा भालेराव, आदेश सानप, अलका जांभेकर, अमोल पाटील, विक्रम नागरे आदी उपस्थित होते.

ना. डॉ. पवार म्हणाल्या की, आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. जर आपल्याला आत्मनिर्भर भारत ही ओळख घेऊन पुढे जायचे असेल, तर शेतकरी, छोटे उद्योग व्यवसाय, बचत गट तसेच तळागाळातील लोकांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे.

स्वनिधी योजनेच्या माध्यमातून पथविक्रेत्या लाभार्थ्यांसोबतच त्याच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी लाभार्थ्याला इतर आठ योजनांचादेखील लाभ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने या योजनेंतर्गत देशपातळीवर साधारणत: 36 लाख लाभार्थ्यांना तीन हजार 592 कोटी रुपयांची रक्कम कर्जापोटी वितरित करण्यात आली आहे. तसेच 12 लाख पथविक्रेत्यांनी पहिल्या कर्जाच्या रकमेची परतफेड केली आहे. राज्यात दोन लाख लाभार्थी असून, एक लाख पाच हजार कुटुंबांनी या योजनेतून मदत घेतली आहे. कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी टीम वर्क आवश्यक असते. प्रगती करण्यासाठी प्रयत्नांची ताकद महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

यांचा झाला सन्मान
रामेश्वर खंड, सुनंदा भामरे, नामदेव शेंडगे, गीता शिंदे, नंदा पाटील, गोपाळ वरणकर, गोकुळ गरूड या पथविक्रेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर बँक ऑफ महाराष्ट्राचे राजेश पाटील, एसबीआय बँकेचे गौतम गरुड, युनियन बँकेचे जिल्हा समन्वयक महेश धुणे, सुनील बारा, बँक ऑफ बडोदाचे जितेंद्र नवलखा, इंडियन ओवरसिस बँकेच्या सरिता देशमुख, बिझनेस बँकेचे वसंत गुरुवाणी या उत्कृष्ट काम करणार्‍या बँकांचा यांचा सत्कार करण्यात आला. तर शिवगंगा व गजानन महाराज महिला बचत गटास प्रत्येकी रुपये एक लाख, जय मल्हार महिला बचत गटाला रुपये दोन लाख, तर सरस्वती महिला बचत गटाला तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button