नाशिक : वाड्या-पाड्यांवर तीव्र पाणीटंचाई; माजी आ. गावित यांनी घेतली ना. ठाकरे यांची भेट
नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेमार्फत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील पर्यटन, टंचाईग्रस्त पाडे व वस्त्यांवर पाणी सुविधांबाबत उपाययोजना करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार निर्मला गावित यांनी त्यांची भेट घेऊन इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या वाड्या-पाड्यांबाबत व पर्यटनाबाबत माहिती दिली.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, हरसूल आदी ठिकाणच्या काही भागांतील पाड्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. चार महिने सतत पाऊस पडूनही उन्हाळ्यात चार महिने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील काही भागांचा पर्यटनाच्या द़ृष्टीने विकास केल्यास स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल म्हणून शासनस्तरावरून प्रयत्न करावे, असे साकडे माजी आमदार गावित यांनी घातले. तसेच वाड्या-पाड्यातील पाणीटंचाईबाबत शिवसेना काय उपाययोजना राबवत आहे, याबाबतची माहिती माजी आमदार निर्मला गावित व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश गावित यांनी पर्यटनमंत्री ठाकरे यांना दिली.
यावेळी जि. प. सदस्या नयना गावित, विवेक मिश्रा आदी उपस्थित होते.