![विशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी आमदारांचा रास्ता रोको](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2FCopy-of-Untitled-Design-80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत पोहोचली असतानाच पुन्हा एकदा सर्वपक्षीय आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी सकाळी मंत्रालयासमोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. भर रस्त्यातच ठिय्या दिल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी या सर्व आमदारांना ताब्यात घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
गुरुवारी सकाळी 11.35 च्या सुमारास काँग्रेस, ठाकरे गट व अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर उतरत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशा घोषणा देत रस्त्यावरच ठिय्या दिला. यामध्ये राजू नवघरे (अजित पवार गट), बाबा दुराणी (काँग्रेस), कैलास पाटील (ठाकरे गट), राहुल पाटील (ठाकरे गट), बाळासाहेब आजबे (अजित पवार गट) आणि मोहन हंबर्डे (काँग्रेस) यांचा समावेश होता. आमदारांच्या ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती.