मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार २९ जून रोजी सरी बरसतील. हा अंदाज खरा ठरल्यास मुंबईकरांचा जून महिन्यातील शेवटचा वीकेंड दमदार पावसाने संपेल. आयएमडीने मुंबईसाठी शनिवारी ग्रीन अलर्ट दिला आहे.
या अलर्टनुसार, अनेक ठिकाणी पावसाच्या चांगल्या सरी पडतील. रायगड जिल्ह्याला शनिवारपासून पुढे सलग तीन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे येथे तुफानी पावसाची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील तापमान काल चांगलेच घसरले. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये शुक्रवारी किमान २५ आणि कमाल ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज किमान तापमान कायम राहताना कमाल तापमानात दोन अंशांनी वाढ अपेक्षित आहे.
रविवारी (२५/३४ अंश सेल्सिअस) त्यात आणखी वाढ होउन कमाल तापमान पुन्हा पस्तिशीच्या घरात जाईल. शनिवार ते सोमवार या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.