मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या सोडतीवर हरकती व सूचना विचारात न घेता, राजपत्रात यादी प्रसिद्ध करण्यात आली असा आरोप करत काँग्रेसने या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी 1 जुलैला होणार आहे.
प्रभात आरक्षण सोडतीमध्ये अनेक नगरसेवकांनी आपले प्रभाग गमावले आहेत. पालिकेच्या काही विभागांमध्ये सर्व प्रभाग महिला आरक्षणात गेले. त्यामुळे बहुतांश नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे.
या आरक्षण सोडतीत काँग्रेसच्या जवळपास 21 नगरसेवकांच्या प्रभागात आरक्षण पडले आहे. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आरक्षणानंतर हरकती सूचना नोंदवून त्याचा विचार केला पाहिजे. पण हरकती सूचनांवर विचार न करता आरक्षणाची यादी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.
याविरोधात पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवार 1 जुलैला हायकोर्टमध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या निकालावर प्रभाग गमावलेल्या नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.