देशात दोन लाख किडनी रुग्ण प्रतीक्षेत
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रत्यारोपणासाठी देशात दोन लाख किडनी आणि एक लाख लिव्हरची गरज असल्यामुळे राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण विभाग शुक्रवारपासून राज्यभर अवयवदान जनजागृती अभियान राबवणार आहे.
सध्या भारतात शेवटच्या टप्प्यात असलेले सुमारे दोन लाख रुग्ण किडनी आणि लिव्हर रोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी केवळ चार हजार किडनी आणि लिव्हरचे प्रत्यारोपण केले जात आहे. त्यामुळे हजारो रुग्ण नवीन आयुष्य जगण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत अवयवांअभावी मृत्युमुखी पडत आहेत, अशी खंत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी अनेक जण उपचारादरम्यान ब्रेनडेड होतात. एक ब्रेनडेड रुग्ण 2 किडनी, 1 लिव्हर, 1 हृदय, 2 फुफ्फुस, 1 स्वादुपिंड यांचे संभाव्य दाता असून एकाच वेळी 7 जीव वाचवू शकतो. तसेच कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतींचे दान करून रुग्ण अपंगत्वापासून मुक्त होऊ शकतो.
राज्यातील 11 कोटी 23 लाख लोकसंख्येतून केवळ 49 हजार लोक अवयवदानाची शपथ घेऊन अवयव दानाला प्रतिसाद देताना दिसतात. सध्या महाराष्ट्र अवयव दानामध्ये भारतात तिसर्या क्रमांकावर आहे. तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी केवळ 72 केंद्रे, लिव्हर प्रत्यारोपणासाठी 36 आणि हृदय प्रत्यारोपणासाठी 9 केंद्रे असून इतर प्रत्यारोपणासाठी ठराविक ठिकाणीच केंद्रे आहेत.
राज्यात नेत्र व त्वचा बँका आणि नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटरही वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि त्याचा अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या द़ृष्टिकोनातून अवयव दान जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.