मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आणि सध्या जामिनावर असलेल्या विक्रम भावेला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला. डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ 20 ऑगस्ट 2013 रोजी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
भावेच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या दशक्रियाविधीसाठी तसेच त्यांच्याशी संबंधित बँकेच्या व्यावहारिक कामांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने सशर्त परवानगी दिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ 20 ऑगस्ट 2013 रोजी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
याप्रकरणी कळसकर आणि अंदुरे या संशयितांना मदत केल्याच्या आरोपाखाली विक्रम भावेला अटक केली होती.
6 मे रोजी उच्च न्यायालयाने त्याला सशर्थ जामीन मंजूर केला होता. पुणे एनआयए विशेष न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास त्याला मज्जाव केला होता.
भावे याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे विधी करण्यासाठी तसेच परिवारातील लोकांना भेटण्यासाठी आणि वडिलांशी संबंधित बँकेच्या व्यावहारिक कामांसाठी चार आठवडे रत्नागिरी येथील मुरडे येथे जाण्यास परवानगी देण्यात यावी,
असा विनंती अर्ज उच्च न्यायालयात नव्याने दाखल केला होता. या अर्जावर खंडपीठाने 10 ऑगस्टपर्यंत पुणे जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी दिली.