मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील सुमारे दोन हजार 620 ग्रामपंचायतींतील तीन हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्त पदांचा पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान होणार आहे.
निधन, राजीनामा, अपात्र किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.