उल्हासनगर ; पुढारी वृत्तसेवा : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने तब्बल 16 जणांचे लचके तोडल्याची घटना शुक्रवारी सुभाष टेकडी परिसरात घडली आहे. जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने इतर कुत्र्यांवरही हल्ले केले. त्यामुळे या कुत्र्यांनी शनिवारी सकाळी एकत्र येऊन पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले
शुक्रवारी दुपारपासून हा पिसाळलेला कुत्रा येणार्या-जाणार्या महिला, मुलांवर हल्ला करत होता. या हल्ल्यात सिद्धी पठारे, विराज रुपवते, प्रांजल सूर्यकांबळे, मदन डमके, विशाल म्हस्के, वाल्मीक वाघ, हर्षित भाटी जखमी झाले. अभिजित चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष रेखा उबाळे यांनी महापालिकेशी संपर्क साधला; मात्र श्वान पकडण्याचे पथक नसल्याने काहीही झाले नाही.
जखमींना रुग्णालयात नेऊन रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले. दरम्यान, शनिवारी सकाळी या भटक्या कुत्र्याने इतर कुत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केले. त्यानंतर मात्र एकत्र आलेल्या या सर्व कुत्र्यांनी या पिसाळलेल्या कुत्र्यावर हल्ला चढवून त्याला ठार मारले.
रात्री 10 नंतर घरात
उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढल्यामुळे लहान मुले व नागरिक रात्री 10 वाजल्यानंतर घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. शहरात दहशत पसरवणार्या भटक्या कुत्र्यांचा महापालिकेने तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.