मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वर्ष 2030 पर्यंत भारतात विकली गेलेली 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाहने विजेवर चालतील, असा निष्कर्ष एका खासगी सर्वेक्षणात नमूद केला आहे. आर्थर डी लिटलने केलेल्या अनलॉकिंग इंडियाज इलेक्ट्रिक मोबिलिटी पोटेन्शियल या संशोधन अहवालानुसार, 2030 पर्यंत इव्ही क्षेत्रातील विक्रीचा आकडा 100 लाख वाहनांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
विविध वाहन विभागांमध्ये इव्ही वाहनांना पसंती देण्याचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा जास्त असेल; पण तोपर्यंत प्रवासी वाहन विभागात इव्हीला पसंती देण्याचा दर केवळ 10 टक्के असेल. त्यामुळे या विभागात इव्हीची विक्री केवळ 5 टक्के असेल. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारत देशात ली-आयन सेल्सचे उत्पादन करण्याच्या योजनांना प्रोत्साहन देत आहे. सबसिडीमध्ये 2.3 बिलियन अमेरिकी डॉलर्स आणि गुंतवणूक क्षमतेमध्ये 7.5 बिलियन अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त अपेक्षित आहेत.
गुंतवणुकीसंदर्भात 2021 मध्ये जवळपास 6 अब्ज अमेरिकन डॉलर्सची विदेशी थेट गुंतवणूक लक्षात घेता, देशाच्या आर्थिक वृद्धीला इंधन पुरवण्यासाठी आणि इव्ही क्षेत्रात योग्य वाढ साध्य करण्यासाठी भारताचे इव्ही उद्योगक्षेत्र 2030 पर्यंत जवळपास 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सची विदेशी गुंतवणूक आकर्षित करू शकेल.
हल्लीच्या काळात मिळणारा सरकारी पाठिंबा आणि इव्ही इकोसिस्टिममध्ये ऑटो-इन्क्युमबेन्ट्सनी केलेली गुंतवणूक यांनीदेखील खासगी इक्विटी व व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट्स यांचा भारताच्या इव्ही क्षेत्रावरील विश्वास वाढवला आहे, असे आर्थर डी लिटलचे भारत आणि दक्षिण आशियाचे मॅनेजिंग पार्टनर बर्निक चित्रन मैत्रा यांनी सांगितले.