मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तसेच, 7 ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
नव्या वेळापत्रकानुसार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल.
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. आता मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे बाकी होते.
सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 ते 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. परिणामी, निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये मतदानाच्या तारखेसह राज्य निवडणूक आयोगाने बदल जाहीर केले आहेत.