

मुंबई : दरवर्षी महाराष्ट्र शासनाने एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवावी, या मागणीचे साकडे राज्यातील मल्लांनी मुंबईतील आझाद मैदानात एक दिवस उपोषण करून सरकारला घातले. ‘कुस्ती वाचवा, महाराष्ट्र केसरी पद वाचवा’ अशा भावना यावेळी मल्लांनी व्यक्त केल्या.
सध्या महाराष्ट्रामध्ये चार-चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. ते थांबवून 60 वर्षांच्या परंपरेनुसार दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, या मागणीसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषण झाले. या उपोषणात 35 महाराष्ट्र केसरी, तर 15 हिंदकेसरीसह पैलवानांचा सहभाग होता.