

विरार: वसई-विरार शहरात सध्या भीषण उकाड्याच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना महावितरणकडून दिवसातून तब्बल तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीज खंडित होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे लहान मुले दिवसभर घरात असतात. मात्र, सततच्या वीज खंडितमुळे पंखे, कुलर आणि इतर आवश्यक उपकरणे बंद पडत असल्याने मुलांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान बालकांसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना रात्रीही वीज खंडितमुळे विश्रांती मिळत नसल्याचे चित्र आहे.महावितरणकडून सुरू असलेल्या दुरुस्ती कामांमुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जात असले, तरी नागरिकांच्या मते ही समस्या रोजचीच झाली आहे.
नियोजनशून्य कामकाजामुळे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वीज बंद केली जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यवसायिकांनाही याचा फटका बसत असून लहान उद्योगधंदे आणि दुकानदारांचे नुकसान होत आहे. दरम्यान, शहरातील विविध भागांत वीज दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
काही ठिकाणी कर्मचारी जीव धोक्यात घालून उंच खांबांवर काम करताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने तातडीने दुरुस्ती सुरू आहे. मात्र, या कामांचा परिणाम नागरिकांवर होणाऱ्या त्रासाच्या स्वरूपात स्पष्टपणे जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी होत आहे.