पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर येथील दोन चिमुकलींवर शाळेत झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाला आज (दि. २०) हिंसक वळण लागले आहे. दरम्यान, बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले असून एसआयटीची नियुक्ती केली आहे. तर या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाणार आहे.
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. यापूर्वी या प्रकरणात SIT ची स्थापना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रस्ताव आजच दाखल करण्याचे आदेश दिले आहेत,असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वे स्टेशन येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एसआयटीची नियुक्ती केली आहे. बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी करून संस्थेच्या सर्व संबंधितांची चौकशी करावी. गुन्हा दाखल करून घेण्यास झालेल्या विलंबाबद्दल संबंधितांची तत्काळ चौकशी करावी, हे सर्व अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.