Uddhav Thackeray : कदमांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात दिले उत्तर, "गद्दार आणि..."
Uddhav Thackeray On Ramdas Kadam allegation : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले, मृत्युपत्र कोणी केले व सही कोणाची घेतली याबाबत माहिती घ्यावी, अशी मागणी करत रामदास कदम यांनी शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत एका वाक्यात आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाकरे ब्रँड चार -पाच पिढ्यापासून
रामदास कदम यांच्या आरोपांबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "ठाकरे बँड काही आजचा नाही, गेल्या चार पाच पिढ्यापासून हा बँड आहे. या ठाकरे बँडची सुरुवात पुण्यापासून झाली. मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे."
दसरा मेळावा अभूतपूर्व झाला
माझ्यावर काही जण टीका करतात याकडे मी दुर्लक्ष करतो कारण माझ्या पाठीशी महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने जनता आहे. हे दसरा मेळाव्यात दिसले. शिवाजी पार्कवर तळ साचले होते. शिवाजीपार्कवर काही दरवाजे नाहीत. आम्हाला काही लोकांना कोंडून ठेवण्याची गरज नव्हती. दसरा मेळावा अभूतपूर्व झाला, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भाजपने केलं ते अमर प्रेम आणि आम्ही केलं तेव्हा लव्ह जिहाद
भाजपसोबत आम्ही तेव्हा कडवट हिंदुत्ववादी होतो आणि त्यांना आम्हाला सोडल्यानंतर हिंदुत्व सोडलं का? आता सरसंघचालक मोहन भागवत हे मशीदित जातात. भाजप अल्पसंख्यकाना सदस्य करून घेतात. सौगत यह मोदी आम्ही काही असं केलं का? जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये जो हल्ला झाला तेव्हा धर्म विचारून मारलं, ज्या पाकिस्तानच्या अतिरेकीनी मारलं त्या पाकिस्तानसोबत मॅच कशी खेळू शकतात, असे सवालही त्यांने केले. भाजपने जे केलं ते अमर प्रेम आणि आम्ही केलं तेव्हा लव्ह जिहाद, असा टोलाही त्यांनी लगावला.

