

Shiv Sena UBT Janaakrosh Andolan Shivaji Park rally
मुंबई : आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. शिवसेना रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करत आहे. सत्ताधारी बिनडोक आहेत, त्याच्याकडे डोक नाही पण खोके आहेत, देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत, तर थीफ मिनिस्टर आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.११) चढवला.
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील सर्व पक्षीयांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे 'महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन' करण्यात आले. यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू तसेच शिवसेना उपनेते, सचिव, आमदार, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की, ही जुलूमशाही आता थांबवली पाहिजे, म्हणून जनता रस्त्यावर उतरली आहे. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तुम्ही कोणत्या रांगेत ठेवला आहे? आम्हाला तुमची लाज वाटते,” असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.
मंत्रीपदावर आरोप झाले तर तात्काळ राजीनामा देण्याची परंपरा असल्याचे सांगून, मी देखील माझ्या काळात मंत्र्यांचे राजीनामे घेतले. वनमंत्र्याला तर वनवासात पाठवले, अशी आठवण करून देत अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी पुरावे दिले. तर मंत्र्यांवर कारवाई होत नाही. एका व्यक्तीला आवडीचे खाते मिळाले, ते म्हणजे ‘रमी मंत्री’. यांच्या चौकशीची गरज नाही, थेट हकालपट्टी केली पाहिजे होती. माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या अचानक गायब होण्याचा मुद्दा उपस्थित करून, “ते सरकारविरोधात होते म्हणून त्यांना काढले, असे मला कळले. जसे चीनमध्ये विरोधक गायब होतात, तसेच इथे घडत आहे का? धनखड कुठे आहेत, त्यांचे तुम्ही ऑपरेशन केले आहे का?, असा सवाल ठाकरे यांनी केला.
आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, असे सांगत 2014 साली नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ‘चाय पे चर्चा’ची आठवण करून देत, “तशीच भ्रष्टाचारावर चर्चा करा,” अशी मागणी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या बाबतीत लोकांना गप्प का बसवले जात आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, त्यांनी दिलेले कारण तुम्हाला पटते का?. तुम्ही मतांची चोरी केली आणि आज विरोधक दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. सत्ता येते-जाते, पण इतिहासात काय नोंद होते, हे महत्वाचे. भ्रष्टाचाराची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे, असे सांगून या शिवाजी पार्कातून आज भ्रष्टाचाराला जाळून टाकणारी मशाल पेटली आहे, असा इशारा ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.