पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसाच्या या पार्श्वभुमीवर मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील आज (९ जुलै २०२४) होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखा लवकरच जाहीर होतील, असे मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे.
पुढील २४ तासांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच मुंबईमध्ये मागील २४ तासांमध्ये कुलाबा येथे ८३.८ मिमी पाऊस झाला तर सांताक्रुझ येथे २६७.९ मिमी इतका मुसळधार पाऊस झाला आहे. यासोबतच सोमवारी (दि. ८) सायंकाळी साडेपाचपर्यंत कुलाबामध्ये १०१.८ तर सांताक्रुझमध्ये १४.१ मिलीमीटर पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी (दि.9) जिल्ह्यातीस सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.