यंदा वारीच्या जादा वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत ३५ कोटीपेक्षा जास्त महसूल जमा होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षाच्या वारीतून एसटीला मिळालेले उत्पन्न आणि खर्च यातील तफावत ४० लाखांवर पोहोचली आहे. यामुळे यंदाच्या वारीत महामंडळाला खऱ्या अर्थाने विठ्ठल पावणार आहे.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी पाच हजार विशेष बस सोडण्याचे एसटीचे नियोजन आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास थेट पंढरपूरकरिता त्यांच्या गावातून एसटी उपलब्ध होणार आहे.
आतापर्यंत उरणहून तीन आणि पनवेलहून एक अशा चार एसटी आरक्षित झाल्या आहेत. या जादा वाहतूकीत ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना सवलती लागू राहणार आहेत. त्यामुळे यंदा एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासी,पर्यटक आणि वारकऱ्यांची संख्या सर्वाधिक असणार आहे.
वर्ष २०२२ मध्ये महामंडळाने केलेल्या जादा वाहतूकीतून एसटीच्या तिजोरीत २३ कोटी १ लाख ७० हजार रुपये जमा तर जादा वाहतूकीसाठी ३० कोटी ५३३ लाख १८ हजार रुपये खर्च आला होता. म्हणजेच महामंडळाला जादा वाहतूकीसाठी ७ कोटी ५१ लाखांचा तोटा सहन करावा लागला होता. गेल्या वर्षी २०२३मध्ये एसटीने आषाढीनिमित्त चार हजार २४५ विशेष बस सोडल्या होत्या.
याव्दारे १८ लाख ३० हजार ९३४ भाविक- प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती.त्यातून महामंडळाला २९ कोटी ७७ लाख ४५ हजार ७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर खर्च ३० कोटी १७ लाख ७८ हजार २९२ रुपये झाला होता. वर्ष २०२२मधील वारी वाहतूकीतील सात कोटींचा तोटा २०२३मध्ये ४० लाख ३३ हजारांवर आला. यंदा महामंडळाने पाच हजार बसचे नियोजन केले आहे. त्यामुळे यंदाच्या जादा वाहतूकीतून महामंडळाला खऱ्या अर्थाने उत्पन्न मिळणार आहे.