मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वांद्रे-वरळी सागरी सेतून एका व्यावसायिकाने बुधवारी (दि.17) समुद्रात उडी मारुन जीवन संपवले. भावेश शेठ असे या व्यापार्याचे नाव असून तो घाटकोपरचा रहिवाशी आहे. सागरी सेतूनवरुन जाताना अचानक कार थांबवून त्यांनी समुद्रात उडी घेतली होती. सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी पोलिसांना सुसायट नोट सापडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
व्यवसायाने व्यावसायिक असलेले भावेश हे घाटकोपर येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. बुधवारी दुपारी ते त्यांच्या कारने वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आले होते. सेतूवरुन जात असताना अचानक त्यांची कार थांबवली. मुलाला फोन केल्यानंतर त्याने कारमधून उतरुन सागरी सेतूवरुन समुद्रात उडी घेतली होती. हा प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने पाहिल्यानंतर त्याने ती माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. या माहितीनंतर वांद्रे पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तीन तास शोधमोहीम घेतल्यानंतर भावेश यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. कारमधून पोलिसांनी सुसायट नोट ताब्यात घेतले आहे. या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. भावेश हे काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी जीवन संपवल्याची बोलले जाते.