

मुंबई : राजेश सावंत
पश्चिम रेल्वे मार्गावर आता कांदिवली ते बोरिवली दरम्यान थांबिवली हे नवे स्टेशन झाले आहे. या स्टेशनचे नामकरण प्रवाशांनीच केले आहे. विशेष म्हणजे या स्टेशनवर गाडी थांबण्याचा वेळही अन्य स्टेशनच्या तुलनेत 10 ते 15 पटीने जास्त आहे. त्यामुळे विरारकडे जाणाऱ्या लोकलची रखडपट्टी आता नित्याचीच झाली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसापासून लोकलचे वेळापत्रकच कोलमडून गेले आहे. चर्चगेट येथून वेळेत सुटणाऱ्या लोकलची कांदिवली ते बोरिवली दरम्यान मोठ्या प्रमाणात रखडपट्टी होते. कांदिवली सोडल्यानंतर प्रत्येक लोकल यार्ड सोडल्यानंतर थांबते. एसी लोकलचा तर येथे हमखास थांबा असतो. त्यामुळे या थांब्याला प्रवाशांनी थांबिवली असे नाव दिले आहे.
रात्री चर्चगेट येथून 7.43 व 7.58 वाजता सुटणाऱ्या एसी लोकल नेहमीच विलंबाने धावत असतात. या लोकल कधीच विरारला आपल्या वेळेत पोहचत नाहीत. अनेकदा या दोन्ही लोकांचा प्रवास किमान 15 ते 20 मिनिटांनी लांबतो. याला सर्वस्वी नवे थांबिवली स्टेशन कारणीभूत आहे.
कांदिवली बोरिवली दरम्यान या लोकल किमान 10 मिनिट थांबतात. त्यामुळे कांदिवली ते बोरिवली हा 3 ते 4 मिनिटाचा प्रवास 15 ते 20 मिनिटांवर गेला आहे. दररोज रखडणाऱ्या या लोकलमुळे प्रवासी आता त्रस्त झाले असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. लोकलच्या होणाऱ्या रखडपट्टीमुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवास जलद व आरामदायी व्हावा, यासाठी अनेकजण तिकीट काढून एसी लोकलने प्रवास करतात. पण हा प्रवास अनेकदा नकोसा वाटतो. पण उखाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे नाईलाजाने प्रवाशांना एसी लोकलचा आधार घ्यावा लागत आहे.
चर्चगेट-विरार एसी लोकल
सुटण्याचा वेळ - रात्री 7.43 वाजता
पोहोचण्याचा वेळ - रात्री 9.09 वाजता
लेटमार्कमुळे पोहोचण्याचा वेळ - रात्री 9.25 वाजता