मुंबई : महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केला. काँग्रेसच्या अंतर्गत 150 जागा लढण्याचे ठरले जात आहे; तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 88 पेक्षा कमी जागांवर लढायचे नाही असे ठरवले आहे. दोन्ही पक्षांच्या जागांचा विचार केला तर ठाकरे गटाला फक्त 44 जागा मिळणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच उद्भवणार असून, या फॉर्म्युल्यावरून मोठे राजकारण होण्याचा धोकाही आंबेडकर यांनी सांगितला.
प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीतील जागांचा फॉर्म्युला सांगितला. लोकसभेला उद्धव ठाकरेंना जे मतदान झाले, ते मतदार आता एकनाथ शिंदे यांच्याकडे वळलेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अधिक जागा देणे हे महाविकास आघाडीला परवडणारे नाही, असे सांगत महाविकास आघाडीत जागावाटपावरून फार मोठा संघर्ष चालू आहे, असे भाष्य आंबेडकर यांनी केले.